मी एक बँक कर्मचारी. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे स्थायिक! सगळीकडेच करोनामुळे भीतिदायक वातावरण, लॉकडाउनमुळे सगळेच घरात बंद; फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठी लोक बाहेर पडत होते, कुटुंबासोबत वेळ घालवत होते, वेगवेगळ्या रेसिपी करत होते; तरीही त्यांच्या मनात प्रचंड भीती! आम्ही मात्र आमच्या कामासाठी रोज बाहेर पडत होतो. नोकरीपेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ हेच मानून! डॉक्टर, पोलिसांसारखंच आम्हालाही घरी येऊन अनेक सोपस्कार केल्यावर आमच्या कुटुंबाला भेटता येत होतं; पण आम्ही आमचं ‘कर्तव्य’ करत होतो जबाबदारीने सर्व नियम पळून!
दोन तारखेला आमच्या एका अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली; त्यामुळे आमच्या सर्वांची टेस्ट घेण्यात आली, अर्थात सावधगिरी म्हणून, कोणतीही लक्षणे नसताना.
आम्ही आठ जण पॉझिटिव्ह होतो. रिपोर्ट ऐकल्याबरोबर खूप टेन्शन आले होते. माझ्या डोळ्यासमोर माझा पाच वर्षांचा मुलगा, एक वर्षाची मुलगी व सर्व कुटुंबीय दिसू लागले; पण पुढील सगळी प्रक्रिया आम्ही जबाबदार नागरिक म्हणून पार पाडली!
मुलांना सोडून राहावं लागणार होतं. आईसाठी तिची मुलं सर्वस्व असतात. पोटात गोळाच आला. भीती वाटली; पण मी मनावर दगड ठेवून म्हाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये अॅडमिट झाले. माझ्याबरोबर बँकेचे सहकारी होतेच! तेथे आम्हाला व्हिटामिनच्या गोळ्या, चहा, नाष्टा, दोन वेळेला जेवण अशी सुविधा मिळत होती. सुरुवातीचे दोन दिवस घरातल्यांच्या आठवणीमध्ये रडण्यात गेले, असंख्य विचारांचे काहूर होते; पण आलेल्या परिस्थितीला सकारात्मक विचारांनी सामोरं गेलं, तर सगळ्याच गोष्टी सुसह्य होतात.
मग आमचे एक रूटीन सेट झाले. माझ्या बँकेतील सहकाऱ्यांचे, कुटुंबीयांचे, नियमित फोन येत होते, व्हॉट्सअॅपचा आधार होता. तिथे आम्ही नियमित व्यायाम, प्राणायाम करत होतो आणि दिलेली औषधे, वाफारे घेत होतो. आठ दिवसांनंतर आमची पुन्हा एकदा टेस्ट घेण्यात आली आणि ती निगेटिव्ह आली. त्यामुळे आम्हाला घरी सोडण्यात आले.
मला यातून सगळ्यांना एकच सांगायचे आहे, की घाबरून न जाता धैर्याने प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे. या आजारामध्ये डॉक्टरसुद्धा पेशंटला तपासायला येत नाही आणि काही लोक चुकीची वागणूक देतात. त्यामुळे पेशंट अजून घाबरून जातात. या आजारातून लवकर बरे व्हायचे असेल, तर मानसिक आणि शारीरिक संतुलन हे खूप महत्त्वाचे आहे. या आठ दिवसांमध्ये आमचे बँकेचे संचालक, सहकारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे आम्हाला सतत काळजीचे फोन येत होते, ह्याचा आम्हाला मोठा आधार वाटत होता. आज आम्ही सहकारी बंधू-भगिनी करोनावर मात करून घरी परतलोय, ह्याचा आनंद तर झालाच आहे; पण घरी येऊन मी पुन्हा नियमाप्रमाणे होम क्वारंटाइन झाले. ह्यात आमच्या कुटुंबीयांची साथ नक्कीच मोलाची होती.
माझे १३ माणसांचे कुटुंब ह्या काळात सेल्फ क्वारंटाइन झाले, अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने सर्व ती खबरदारी घेऊन! ह्यात प्रशासनाचेही आभार. संबंधित अधिकारी फोनवर आमच्या कुटुंबीयांचे वेळोवेळी अपडेट्स घेत होते. आता आमचे संपूर्ण कुटुंब रूटीन सुरू करण्यासाठी सज्ज आहे. आमच्यापासून संक्रमणाचा धोका आता नाही. मागचे १५-२० दिवस सर्वांसाठी परीक्षेचे होते; पण एकमेकांसाठी आपण उभे राहिलो, तर कोणत्याही प्रसंगला सामोरे जाणे कठीण नसते. अशा प्रसांगत कोणाला एकटे पाडू नका; खरी साथ हाच मोठा आधार असतो अशा वेळी!
ह्यात गावातील अनेक मंडळींचे सहकार्य खूप मोलाचे होते. क्वारंटाइनच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता माझ्या कुटुंबासाठी डबे, दूध, फळे, भाजीपाला अशा जीवनावश्यक गोष्टी पोहोचवणारे सर्व जण आमच्यासाठी कोविड योद्धेच!
... तर घाबरू नका, आजार लपवण्याची गरज नसते, गरज असते ती त्यावर योग्य तो उपचार घेण्याची!
तेव्हा काळजी घ्या एकमेकांची!
- सौ. पूजा अनिकेत श्रोत्रीय